“निवडणूक आयोग हातात असता, तर भाजपचे चार तुकडे केले असते” संजय राऊतांचा हल्लाबोल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुंबईला कमकुवत करण्याचे कारस्थान गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतून रचले जात असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “आज निवडणूक आयोग आणि पोलीस माझ्या हातात असते, तर भाजपचे चार तुकडे केले असते,” असे अत्यंत आक्रमक विधान त्यांनी केले.
मुंबईच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करताना राऊत म्हणाले की, “मुंबईचे डेथ वॉरंट दिल्लीतून निघाले आहे. ते आपल्याला थांबवावेच लागेल. ठाकरे बंधूंनी जे सांगितले, तेच सत्य आहे. आपल्याला मुंबई वाचवायची आहे.”
शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले, “शिंदे यांची शिवसेना ही अमित शहा यांनी तयार केलेली पार्टी आहे. जोपर्यंत अमित शहा आहेत, तोपर्यंतच यांची दुकानदारी चालणार आहे.” मुंबईत शिवसेनेने आतापर्यंत २३ महापौर दिल्याची आठवण करून देत, आगामी महापालिका निवडणुकीतही मुंबईत मराठी महापौरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘हिंदू महापौर की मराठी महापौर’ या वादावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “हा वाद निरर्थक आहे. मराठी माणूस हा हिंदूच आहे.”
महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “लोकसभा आणि विधानसभेत आम्ही काँग्रेससोबत होतो आणि महापालिकेतही एकत्र आहोत. आम्ही सगळे मिळून पुन्हा मुंबईवर भगवा फडकवू.” तसेच, “हिम्मत असेल तर वेगळी मुंबई बनवून दाखवा. जिथे ठाकरे आहेत, तिथेच खरी शिवसेना आहे,” असे आव्हानही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.