दिल्लीत केजरीवाल यांना अटक, मुंबईत भाजप कार्यालयच्या सुरक्षेत वाढ
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक ; ठिकठिकाणी आंदोलने सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीच्या पथकाने अटक केली. यावरून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. मुंबईत देखील आम आदमी पक्षाकडून आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर शुक्रवारी पहाटेपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथकासह राज्य राखीव पोलीस दल आणि मुंबई पोलिसांचे पथकातील शेकडो अधिकारी तसेच कर्मचारी भाजप कार्यालयाबाहेर तैनात आहेत. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहेत. दुसरीकडे दिल्लीतही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी रात्रीपासून पोलिसांनी आपच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सध्या अरविंद केजरीवाल ईडीच्या ताब्यात असून त्यांच्या सुरक्षेबाबत आपच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवाल यांना झेड + सुरक्षा कवच आहे. आता ते केंद्र सरकारच्या ईडीच्या ताब्यात आहे. पण, त्यांच्या सुरक्षेबाबत आम्हाला काळजी आहे. असे मत मंत्री अतिषी यांनी ट्विटरवर व्यक्त केलंय. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील नाराजी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. तुम्ही अरविंद केजरीवाल यांना अटक कराल पण त्यांच्या विचाराला तुम्ही कसे कैद कराल. केजरीवाल ही एक व्यक्ती नसून, तो एक विचार आहे आणि आम्ही आमच्या नेत्याच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत, अशी पोस्ट भगवंत मान यांनी ट्विटरवरून केली आहे.