कर्जतमध्ये अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स काढले, रोहित पवार संतापले; संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने काढून टाकले आहेत. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेने आणि जड अंतःकरणाने लावलेले मा. अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले आहेत. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. मा. अजितदादांचा अवमान करणारी, नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारी आणि त्यांच्या दुःखावर मीठ चोळणारी आहे. याबाबत चौकशी करून सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, ही विनंती असल्याचे रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अजितदादांच्या अंत्यविधीला लोटलेली हजारो कार्यकर्ते आणि चाहत्यांची गर्दी ही त्यांनी कमावलेली होती. अजित पवार या जगातून गेलेच नाहीत अशा भावना कार्यकर्त्यांच्या होत्या. अजूनही कार्यकर्ते निःशब्द आहेत. त्यांना अजूनही सुचत नाहीये. राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षासाठी मोठा यक्ष प्रश्न निर्माण होणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा मनात पोरका झालो असल्याची भावना आहे. सगळं संपल्यासारखं वाटतंय. दादा आधारस्तंभ होते. असा एकमेव नेता होता दर मंगळवारी आम्हाला बोलवायचे. आमच्या समस्या ऐकायचे. आमच्या मतदारसंघाच्या प्रत्येक कामाची वीट त्यांनी रचली आहे. काय करणार आम्ही आता? कुणाकडे बघणार अजून. आमच्या दृष्टीने आता सगळं संपलं आहे. असा दिवस कधी बघायला मिळेल असा आयुष्यात कधी विचार केला नव्हता. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते देत आहेत.