नवी मुंबईत दोन शाळकरी मुलांची आत्महत्या
नवी मुंबई- नवीमुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिसिंग प्रकरणानंतर आता एकाच दिवशी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अभ्यासातील तणावामुळे दोन्ही विद्यार्थ्यांनी हे टोकाचं पाऊस उचलल्याची माहिती मिळत आहे. काल सोमवारी दुपारच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पृथ्वी ढवळे (वय १४ वर्ष) आणि दर्शील पाटील (वय १५ वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. शाळेतील अभ्यास कठीण जात असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शील पाटील हा अल्पवयीन विद्यार्थी करावे परिसरात राहत होता. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याने बहिणीच्या मोबाइलवर मॅसेज पाठवला. माझ्यावर अभ्यासाचा तणाव असून आपण कुटुंबियांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, असा मॅसेज पाठवत त्याने तलावात उडी घेतली. दुसरीकडे नेरूळ येथे राहणाऱ्या १४ वर्षाय पृथ्वी ढवळे याने देखील टोकाचं पाऊल उचललं. घरात कुणी नसल्याचं पाहून पृथ्वीने बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. अभ्यासाच्या तणावातून एकाच दिवशी दोन मुलांनी जीवन संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतून अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. कामोठे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे आणि कळंबोली पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातच आता या घटना घडल्याने आजूबाजूच्या परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.