१८ वर्षीय तरुणाचा उपचाराविना मृत्यू; रस्ता नसल्याने डोलीतून ४ किलोमीटरचा जीवघेणा प्रवास

Spread the love

१८ वर्षीय तरुणाचा उपचाराविना मृत्यू; रस्ता नसल्याने डोलीतून ४ किलोमीटरचा जीवघेणा प्रवास

योगेश पांडे / वार्ताहर

पालघर – मुंबईपासून अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या जव्हार तालुक्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यात एकीकडे चौथी मुंबई वसणार, देशातील सर्वात मोठं आणि जगातील पहिल्या दहा बंदरापैकी एक बंदर होणार, बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे, शिवाय पालघर समृद्धी महामार्गशी जोडणार, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ अशी विकासकामं होत आहेत. हे सर्व पाहता पालघर वेगाने विकसित होत आहे, असं वाटेल. मात्र दुसरीकडे केवळ रस्त्याअभावी एका तरुणाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाचा नाकर्तेपणा देखील समोर आला आहे.

जव्हारमधील तिलोंडा (आंबेपाडा) या दुर्गम गावातील १८ वर्षीय शैलेश मगन वागदडा या तरुणाचा केवळ वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गावात रस्ता नसल्याने या तरुणाला चक्क डोलीत टाकून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ आल., मात्र निसरड्या आणि खडतर वाटेने प्रवास करताना झालेल्या उशीरामुळे त्याचा प्राण वाचू शकला नाही.

शैलेशची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक होते. मात्र, तिलोंडा गावात मुख्य रस्त्यापासून साडेतीन ते चार किलोमीटरपर्यंत पक्का रस्ताच उपलब्ध नाही. रुग्णवाहिका किंवा साधी चारचाकी गाडीही गावात येऊ शकत नसल्याने ग्रामस्थांनी पारंपरिक ‘डोली’ तयार केली. भर उन्हात, जंगलातून आणि डोंगरदऱ्यांतून वाट काढत ग्रामस्थ शैलेशला खांद्यावर घेऊन चांभारशेत येथील आरोग्य केंद्राकडे धावले. मात्र, हे अंतर पार करेपर्यंत शैलेशची शुद्ध हरपली होती आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तिलोंडा गावातील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी आजही ३ ते ४ किमीची पायपीट करावी लागते. पावसाळ्यात तर या गावाचा संपर्क जगाशी पूर्णपणे तुटतो. ग्रामस्थांनी रस्ता आणि आरोग्य सुविधांसाठी अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली. प्रत्येक वेळी प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळाले, पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. मुंबईच्या इतक्या जवळ असूनही जव्हार-मोखाड्यातील आदिवासी आजही वीज, पाणी आणि रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत.

शैलेशच्या मृत्यूनंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. “आमच्या मुलाचा बळी प्रशासकीय दिरंगाईने घेतला आहे,” असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जर तातडीने रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर जव्हार तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon