उल्हासनगरात महायुती तुटली! भाजपाचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; अचानक घडामोडी वाढल्या
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचे मतदान होणार आहे. तसेच १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यापूर्वी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ऐनवेळी पक्षातील निष्ठावंतांचे तिकीट कापलं गेल्यामुळे अनेकांमध्ये नाराजी दिसत आहे. दरम्यान, उल्हासनगर महापालिकेशी संबंधीत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
उल्हासनगरमध्ये महायुती तुटली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही बाजूकडून महायुतीला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
उल्हासनगर शहरात महायुती अखेर तुटली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते महायुतीसाठी आग्रही होते. मात्र दोन्ही पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून महायुतीसाठी अनुकूल वातावरण दिसले नाही. अखेर भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वाधारीया यांनी आता महायुती होणार नसून आम्ही संपूर्ण ७८ जागांवर आमच्या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितलं असल्याचं म्हटले आहे.
वधारिया म्हणाले , आम्ही दोन वेळा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याना महायुतीची बोलणी करण्यासाठी निरोप पाठवला. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तर दुसरी कडे शिवसेना, साई पक्ष आणि टीम ओमी कलानी यांच्या दोस्ती गटबंधनाच्या जागा वाटपा संदर्भातील पहिली महत्त्वपूर्ण बैठक रिजेन्सी हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीस शिवसेना, टीम ओमी कलानी, साई पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकी मध्ये सर्वच्या सर्व ७८ जागांबाबत चर्चा झाली. भाजपच्या सहभागाविषयी विचारले असता, दोस्तीचा गटबंधनच्या फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगत भाजप बाबत उत्तर देणे टाळले. महायुती बाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे घेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.