नशामुक्त मुंबई अभियानाला मोठे यश; २०२५मध्ये ८१४ कोटींचे ड्रग्ज जप्त
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : नशामुक्त भारत अभियानाच्या धर्तीवर राज्य सरकारने राबवलेल्या नशामुक्त मुंबई उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. वर्ष २०२५ मध्ये मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत मोठी झेप घेत १०९६ गुन्हे दाखल केले असून १३८६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये एकूण १६५३ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची बाजारातील अंदाजे किंमत तब्बल ८१४ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती डीसीपी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई श्री. नवनाथ ढवळे यांनी दिली.
पीटीएनडीपीएस कायद्यान्वये दोन आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच संघटित अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कठोर पावले उचलताना मुंबई पोलिसांनी दोन टोळ्यांवर कारवाई करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
यासोबतच २०२५ मध्ये २५६० किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे १३६ कोटी रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. परदेशातून भारतात अंमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्या चार आरोपींना प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणून अटक करण्यासही यश मिळाले आहे.
शहरात येणाऱ्या नऊ दिवसांच्या उत्सवकाळात अंमली पदार्थांचा वापर किंवा तस्करी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली असून, गुन्हे आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.