टिटवाळ्यात ‘लव्ह जिहाद’ प्रकरण; संशयी व हिंसक पतीकडून पत्नीवर अत्याचार, दोन्ही मुलांचे अपहरण
पोलीस महानगर नेटवर्क
टिटवाळा – टिटवाळा परिसरात घडलेल्या कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात पतीकडून सातत्याने होणाऱ्या मारहाणी, चारित्र्यावर संशय, घटस्फोटास नकार आणि दोन्ही मुलांना वेगळे करण्याच्या प्रकारामुळे एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध टिटवाळा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. तक्रारदार सोनी राजूप्रसाद गौड (वय २६) ही तरुणी मुंबईतील डॉकयार्ड रोड परिसरात राहत असताना शासकीय शाळेत दहावीत शिकत होती. त्याच परिसरात राहणाऱ्या बाबू अन्वरअली सय्यदशी तिची ओळख झाली. प्रेमसंबंधातून १ डिसेंबर २०१८ रोजी कोर्टात विवाह झाला आणि तिचे नाव ‘सना बाबू अली सय्यद’ असे ठेवण्यात आले. विवाहानंतर ती टिटवाळ्यात राहायला आली, मात्र नंतर काही काळ भायखळ्यातील सासरच्या घरी वास्तव्यास गेली.
भायखळ्यात असताना घरकामासोबत दिराच्या तिन्ही मुलांची जबाबदारी तिच्यावर टाकण्यात आली. माहेरातील एका ओळखीच्या व्यक्तीशी रस्त्यावर बोलणे झाल्यामुळे भावजयीने तिच्याविरुद्ध चुकीचा समज पसरवला आणि त्यानंतर तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. पतीकडून सातत्याने मारहाण सहन करावी लागत होती. टिटवाळ्यात आल्यावरही तिची स्थिती बदलली नाही. सुरुवातीला मूल होत नसल्याचे कारण देत पती तिला घरात कोंडून मारहाण करत असे. नंतर दोन मुले झाल्यानंतरही पतीचे संशय आणि अत्याचार सुरूच राहिले. पतीला दारूचे व्यसन लागल्याने तो पत्नीवर माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकू लागला. एका बिल्डरशी झालेल्या व्हॉट्सॲपवरील संभाषणाचा विपर्यास करून पतीने तिला घरात कोंडून मारहाण केली. घटस्फोटाची इच्छा व्यक्त करताच “मारून टाकेन, पण घटस्फोट देणार नाही” अशी धमकी दिली.
आईच्या घरी राहायला गेल्यानंतर पती आणि मोठ्या दिराने तिला गंभीर जीवघेण्या धमक्या दिल्या. दिराने तर “चिरून कुकरमध्ये टाकून देऊ, कुणालाही समजणार नाही” असेही म्हटले. ४ ऑगस्ट रोजी पतीने दोन्ही मुलांना तिच्यापासून वेगळे केले. सातत्याने होणाऱ्या अत्याचारांमुळे आणि मुलांना परत न देण्याच्या हट्टामुळे पीडित महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून पती व सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, टिटवाळा तालुका पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करत आहे.