उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर महापालीकेची रणनिती ठरवली, मुंबई जिंकण्यासाठी १२ जणांवर खास जबाबदारी सोपवली
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्रात पुढच्या तीन-चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाच्या असतात. कारण या निवडणुका म्हणजे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. कार्यकर्ते घडवण्याबरोबर पक्षाची संघटनात्मक बांधणी भक्कम करता येते. म्हणून या निवडणुका सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं. यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेसाठी प्रतिष्ठेची आहे. दोन्ही ठाकरे बंधुंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. कारण दोन्ही ठाकरेंचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटल्याच विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं होतं. आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने विशेष रणनिती आखली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुंबईतील उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून महानगर पालिकेच्या तयारीला आधीपासूनच सुरवात झाली आहे. यानंतर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटाकडून मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलं आहे. उपनेत्यांनी मतदार संघात जाऊन आढावा बैठका, माजी नगरसेवक, शाखा प्रमुख इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे. काल राज्य सरकारच्या वतीने प्रभागासंदर्भात शासन निर्णय काढला असून ठाकरे गटाच्या वतीने पालिकेची तयारी केली जात आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ वॉर्ड आहेत.
विधानसभानिहाय उपनेत्यांवर देण्यात आली महत्त्वाची जबाबदारी
१) अमोल कीर्तीकर – दहिसर, बोरिवली, मागाठाणे, २) उद्धव कदम – चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम,३) विलास पोतनीस – दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व,
४) विश्वासराव नेरूरकर – वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम,५)रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम,६) गुरुनाथ खोत -, चांदिवली, कलीना, कुर्ला,७) नितीन नांदगावकर – विक्रोळी, भांडुप, मुलुंड,८) सुबोध आचार्य – घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द, ९) मनोज जमसूतकर – अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा, १०) अरुण दूधवडकर – धारावी, माहीम, वडाळा,११) अशोक धात्रक – वरळी, दादर, शिवडी आणि १२) सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी.