कल्याणच्या लक्ष्मी मार्केटमध्ये रक्तरंजित थरार, जनावरांना चारा घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – जनावरांना चारा घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर अज्ञाताने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. लक्ष्मी मार्केटमध्ये सकाळी सहा वाजता ही घटना घडली. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. बारक्या मढवी असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावर मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून तपास पोलीस करत आहेत.
कल्याण पश्चिमेकडील सापाड गावात बारक्या मढवी आपल्या कुटुंबासह राहतात. मढवी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कल्याण स्टेशन परिसरातील लक्ष्मी मार्केट येथे जनावरांना चारा घेण्यासाठी आले होते. याच दरम्यान अज्ञात इसमाने मढवी यांच्यावर कोयत्याने सहा ते सात वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. महात्मा फुले पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.