घरच्यांचा नकाराला कंटाळून अल्पवयीन प्रेमीयुगलाची विक्रोळी स्थानकात एक्स्प्रेस गाडीसमोर झोकून देत आत्महत्या
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईतील विक्रोळीमधून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. यात एका अल्पवयीन प्रेमियुगलाने टोकाचे पाऊल घेत आपले जीवन संपवले आहे. यातील मुलीचे वय अवघे १५ असून मुलाचे वय १९ वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर धावत्या रेल्वे एक्सप्रेससमोर उडी घेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ही पुढे आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २६ जानेवारीच्या दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यातील पंधरा वर्षीय मुलगी ही परप्रांतीय असून मुलगा हा महाराष्ट्रातील रहिवाशी आहे. या दोघात जवळीक असून प्रेम प्रकरणाला प्रांतीय अथवा जातीय अँगल असून लग्नाला विरोध केल्याने ही घटना घडलीय का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. हे दोघेही भांडुपच्या हनुमान नगर परिसरातील रहिवासी होते. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ही मुलगी आपल्या आजीसोबत बाहेर गेली होती. मात्र मधातच ही मुलगी आजीपासून बाजूला झाली. त्यानंतर ती गायब असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांतर्फे शोधाशोध केली असता रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती दिल्याने हे प्रकरण सोमवारी उजेडात आले. परिणामी या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.