दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? ४८ वर्षांनी कोर्टाने सुनावला निकाल; मशीद नसून मंदिर असल्याचा निवाडा
योगेश पांडे/वार्ताहर
कल्याण – ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याबाबत मंगळवारी कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. किल्ल्यावर मंदिर की मशीद या वादावर कोर्टाने मंगळवारी निकाल दिला आहे. जवळपास ४८ वर्षांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. १९७१ साली ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांकडे मंदिर का मशीद यावरुन सुनावणी झाली होती. त्यावेळी किल्ल्यावरील वास्तू ही मंदिरच असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरच्या काही वर्षातच एका मुस्लिम संघटनेने ही वक्फची मालमत्ता असल्याचा दावा केला. यावर पुन्हा कोर्टात सुनावणी झाली. अखेर सत्र न्यायलयाने ही वास्तू मशीद नसून मंदिर असल्याचा निवाडा दिला. राज्य सरकारचा दावा योग्य असल्याचे कोर्टाने म्हटले.
डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी या निकालाचे स्वागत करताना न्यायालयाचे आभार मानले. राज्य सरकारने आता न्यायालयाच्या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाने १९६८ साली दुर्गाडी किल्ल्याबाबत काही आदेश जारी केले. राज्य सरकारच्या आदेशानुसार, मुस्लिम पक्षाला फक्त रमझान ईद व बकरी ईद या दोन दिवशी नमाज अदा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १९७६ साली मजलीस या मुस्लिम संघटनेने सदर किल्ला हा मंदिर नसून मशीद आहे असा दावा दाखल केले होता. अनेक वर्षे हा दावा प्रलंबित होता. नंतर मजलीसने सदर जागा ही वक्फची मालमत्ता आहे हे घोषित केले. कोर्टाने मजलिसच्या दाव्याविरोधात जवळपास ४८ वर्ष सुनावणी सुरू होती. त्यानंतर आता कोर्टाने राज्य सरकारच्या बाजूने निकाल दिला.