जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ, तर चेतन पाटीलला दिलासा
योगेश पांडे/वार्ताहर
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. या प्रकरणावरुन राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीनं या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन आपटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी पहिल्यांदा चेतन पाटील त्यानंतर जयदीप आपटे याला अटक केली होती. आज त्या प्रकरणी सिंधुदुर्ग मधील न्यायालयात सुनावणी झाली होती. आजच्या सुनावणीत जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर, चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आजच्या सुनावणीसंदर्भात सरकारी वकील ॲड. तुषार भणगे यासंदर्भात माहिती दिली आहे. ॲड. तुषार भणगे म्हणाले की, आरोपी जयदीप आपटे विसंगत माहिती देतोय.त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती,परंतु न्यायालयाने १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.नवीन कायद्यानुसार पोलिसांना जेव्हा हा आरोपी हवा असेल त्यावेळी न्यायालयाच्या परवानगीने पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात. जयदीप आपटे याच्याकडून पोलिसांना अधिक माहिती मिळवायची आहे. या प्रकरणातील इतर व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळवायची असल्यानं सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. या प्रकरणात तपासकाम करणं गरजेचं असल्यानं न्यायालयानं आमचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटील याला ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. सिंधुदुर्ग पोलिसांनी चेतन पाटील यांना अटक केली होती. आज पाटील यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.