धक्कादायक ! शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थ्यांनीने घेतले स्वताला पेटवून ; त्रासाला कंटाळून केली आत्महत्या
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यामधील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि त्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहात (हॉस्टेल) राहणाऱ्या विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. या हॉस्टेलमध्ये काम करणारा तरुण तिला त्रास देत होता. तसेच, तिच्या खोलीत राहणारी विद्यार्थिनी तिला विविध प्रकारे त्रास देत होती. त्यामुळे पिडीत विद्यार्थिनीने ७ मार्च रोजी स्वत:ला पेटवून घेतले होते. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी १९ मार्च रोजी तिची झुंज अपयशी ठरली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणुका बालाजी साळुंके (वय १९) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. तर या प्रकरणी हॉस्टेलमध्ये कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (वय १९) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी धोंडीबा साळुंखे (वय ४९, जेवळी तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची मुलगी रेणुका ही भारती विद्यापीठ येथील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. होस्टेलच्या कॅन्टीन मधील कर्मचारी सतीश जाधव हा रेणुकाला सारखे आय लव्ह यू असे मेसेज करत होता. तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले, असे तो सारखा येता-जाता बोलायचा. या सर्व प्रकारामुळे रेणुका घाबरली होती. तसेच हॉस्टलमध्ये तिची रुममेट मुस्कान सिद्धू ही देखील रेणुकाला अभ्यास करु देत नव्हती. अभ्यास करत असताना रुम मधील लाईट बंद करत होती. दोघांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांची मुलगी रेणुका हिने होस्टेलच्या बाथरुममध्ये ७ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेतले. तिला तातडीने पुण्यातील सुर्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.