सावधान मुंबईकर ! बोगस मिठाचा मोठया प्रमाणात काळाबाजार !
नामवंत कंपनीच्या नावाने होणाऱ्या विक्रीचा पोलिसांकडून पर्दाफाश
मुंबई – काही भामटे शॉर्टकटने पैसा कमावण्यासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत पोलीस दलाच्या सीबी कंट्रोलने बोगस मिठाचा काळाबाजार पुन्हा एकदा उघडकीस आणला आहे. देशातील नागरिकांचे सर्वाधिक पसंतीचे शुद्ध मीठ विकणाऱ्या कंपनीच्या पिशव्या छापून बोगस मीठ विकणाऱ्यावर कांदिवली परिसरात कारवाई करण्यात आली आहे. बोगस मिठाची अनेक दिवसांपासून मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये विक्री होत असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.
कांदिवली परिसरात नामांकित कंपनीच्या नावाखाली मीठ विकण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली झाली. त्यानुसार सीबी कंट्रोलच्या पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता त्यावेळी एक व्यक्ती पिशव्यांमध्ये मिठाची पॅकिंग करताना आढळून आला.पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत ५३ पिशव्या, १ हजार ३२५ किलाे मीठ असा एकूण ३७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं.१४५/२०२४ मुंबई आर्थिक गुन्हे शाखा, रजि.नं.१८/२०२४ भा. द.वि.कलम ४२०,३४ तसेच ५१,६३ या भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितले.