ठाकरेंच्या मोर्चाची निवडणूक आयोगाकडून दखल, दुबार नावांच्या मुद्द्यावर ‘डबल स्टार’चा उतारा; मतदार यादीबद्दल मोठा निर्णय
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तसंच निकालाच्या तारखांची घोषणा केली आहे.२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, ज्यासाठी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.७ नोव्हेंबरला मतदार याद्या जाहीर होणार आहेत. तर १० डिसेंबरपासून १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. यानंतर १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. तर २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे.
२ डिसेंबरला महाराष्ट्रामधल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे, तर या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहेत. निवडणूक आयोगाने अजून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा केलेली नाही.
निवडणुका जाहीर व्हायच्या आधी राज्यातल्या विरोधी पक्षांनी दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. तसंच निवडणूक यादांमधला घोळ निस्तरून दुबार मतदारांची नावं यादीतून काढा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. विरोधकांकडून होत असलेल्या दुबार मतदारांच्या या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.दुबार मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाने नियम बनवला आहे, ज्यात मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येईल. तसंच ज्याचं नाव मतदार यादीमध्ये दोन वेळा आलं आहे, त्याच्या नावापुढे डबल स्टार लावला जाणार आहे. दुबार मतदारांची नोंद वेगळी असणार आहे. दुबार मतदारांसंदर्भात दक्षता घेतली असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
ज्या मतदारांसमोर डबल स्टार असेल, त्या मतदाराकडून डिक्लेरेशन घेतलं जाईल आणि एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल. ज्यांच्या नावापुढे डबल स्टार असेल त्यांनी निवडणूक आयोगाशी संपर्क साधावा. ज्यांची नावं एकापेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये असेल त्यांची नावं हटवली जातील. ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांना मतदान करता येईल. तसंच ७ नोव्हेंबरला मतदारांची यादी जाहीर होईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.