ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान मुंबईत धमकीचा फोन; एका विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी, सर्व यंत्रणा अलर्ट
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला. सध्या देशभरात ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा केला जात आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई विमानतळावरून एक धक्कादायक बातमी आली आहे. मुंबई विमानतळावर इंडिगोच्या एका विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सहार विमानतळाच्या हॉटलाइनवर एक धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे. चंदीगडहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याचं फोनद्वारे सांगण्यात आलं. ही माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या. रात्री उशिरा विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आलं आणि प्रवाशांना खाली उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. मुंबई पोलीस आणि सुरक्षा संस्था या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
हा धमकीचा फोन अशा वेळी आला जेव्हा भारतीय सैन्य ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान सीमेच्या आत ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस् करत होते. या बातमीने संपूर्ण देशात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे. इतकंच नाही तर, राजस्थान सीमेला लागून असलेल्या पाकिस्तान भागातील दहशतवाद्यांचे अड्डेही या कारवाई दरम्यान उद्ध्वस्त करण्यात आले, त्यानंतर राजस्थान सरकारही आता हाय अलर्टवर आहे. त्यातच मुंबई विमानतळावर बॉम्ब ब्लास्टच्या धमकीचा फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. दहशतवाद्याकडून अद्यापजरी कोणताही मोठा धोका निर्माण झालेला नसला तरी, भारताच्या कारवाईमुळे दहशतवाद्यांमध्ये खळबळ माजल्याचं दिसत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.