मुंबईतील हादरवणारी घटना!
रात्री बिर्याणी, कलिंगड खाल्याने दुसऱ्या दिवशी भयंकर घडले; एकापाठोपाठ ४ जणांचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील पायधूनी परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या मुली आयशा (१६) व झैनब (१३) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री या कुटुंबाने बिर्याणी खाण्याचा बेत आखला होता होता. या चौघांनी एकत्र जेवण केल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी कलिंगडही खाल्लं. मात्र, कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने चौघेही घरातच बेशुद्ध पडले. यानंतर तातडीने डॉक्टर कुरेशी यांना बोलावण्यात आलं. डॉक्टर घटनास्थळी पोहोचले तेव्हा चौघेही बेशुद्ध अवस्थेत होते.त्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनीही त्यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं. दुर्दैवाने, उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेमागे विषबाधेचं कारण असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी नेमकं कारण काय याबाबत अजूनही स्पष्टता नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.
पायधुनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. शेजारी डोकाडिया कुटुंबीयांच्या घरात पोहोचले तेव्हा चौघेजण बेशुद्ध पडले होते. त्यांनी संपूर्ण घरात उलटी केली होती. त्यावेळी शेजाऱ्यांनी चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या डॉ. कुरेशी यांना बोलावून घेतले. डॉ. कुरेशी यांनी सांगितले की, मला काहीजण घरी बोलवायला आले. मी डोकाडिया यांच्या घरी पोहोचलो तेव्हा सगळेजण बेशुद्ध अवस्थेत होते. लहान मुलीची नसही सुरु नव्हती. मी या सगळ्यांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली. यानंतर लहान मुलीला साबु सिद्दिकी रुग्णालयात नेले तर तिच्या आई-वडिलांना जे.जे. रुग्णालयात नेले. त्याठिकाणी नवऱ्याचा रक्तदाब कमी झाला, मग त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचारादरम्यान नवरा बायको आणि मुलींचा मृत्यू झाला, असे डॉ. कुरेशी यांनी सांगितले.
मी या सगळ्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. पण त्यांच्या शरीरात काहीतरी असा विषारी घटक गेला होता की, त्यांची तब्येत झपाट्याने बिघडत गेली. त्यांच्या रक्तात अॅसिड तयार झाले होते. प्राथमिक तपासणीतून त्यांनी रात्री दीड वाजता कलिंगड खाल्ल्याची माहिती समोर आली. हा सगळा प्रकार कशामुळे झाला हे पोलीसच सांगू शकतील. पण आम्हाला जो संशय आहे, तो कलिंगडावरच आहे, असे डॉ. कुरेशी यांनी म्हटले.