कल्याणमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये तुफान राडा; दीड तास वाहतूक ठप्प
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण शहरात अल्पवयीन मुलांमधील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाल्याने मंगळवारी सायंकाळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. रस्त्यावरच दोन गट आमने-सामने आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून मुख्य मार्गावर सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली.
प्राथमिक माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार सुरू झाला. सुरुवातीला क्षुल्लक स्वरूपाचा असलेला वाद काही वेळातच वाढत गेला. दोन्ही बाजूंनी स्थानिक तरुणांना घटनास्थळी बोलावण्यात आले आणि त्यानंतर रस्त्यावरच जोरदार गोंधळ व हाणामारी झाली. या प्रकारामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला पांगवण्यासाठी काही काळ प्रयत्न करावे लागले. संबंधित अल्पवयीन मुलांसह गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अल्पवयीनांकडून वाढती आक्रमकता, बेफिकीर वर्तन आणि पालकांचे दुर्लक्ष यामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. परिसरात पोलीस गस्त वाढवावी, अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी आणि अशा प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
लहान वयातील किरकोळ वादातून गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे हे ताजे उदाहरण असून पालकांनी मुलांच्या वागणुकीकडे आणि संगतीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.