एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; पालघर जिल्ह्यात ६० वर्षीय महिलेची राहत्या घरात निर्घृण हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघर जिल्ह्यातील वसई शहरातील बऱ्हाणपूर उमेळमान गावात एका ६० वर्षीय महिलेची राहत्या घरात घुसून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘भिमाई’ नावाच्या बंगल्यात एकट्याच राहणाऱ्या दुर्गा संजयराव बनसोडे (६०) यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये आढळून आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा बनसोडे या एकट्याच राहत होत्या, तर त्यांचा मुलगा वालीव येथे वास्तव्यास होता.सोमवारी सकाळपासून आई दुर्गा त्यांचा फोन उचलत नसल्यामुळे मुलाला संशय आला. रात्री घरात प्रवेश केला असता हॉलमध्ये रक्ताचे डाग दिसून आले आणि घाबरलेल्या भावाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी बेडरूममध्ये मृतदेह आढळल्याची नोंद केली.
गुन्ह्याचे स्वरूप पाहता, बेडवरील गादी काढून बेड उघडलेला होता आणि बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावलेले होते. या बाबींवरून हा गुन्हा नियोजनपूर्वक करण्यात आलेला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेहावर झालेली जखम आणि घरातील परिस्थिती यावरून हत्येची भयंकर रूपरेषा दिसून येते. सध्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. घरातून काही चोरी झाली आहे का? याची पडताळणी कुटुंबीयांकडून सुरू असून, पुढील तपासात अधिक माहिती स्पष्ट होईल. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांची चौकशी आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याची कामे सुरू आहेत.
वसईतील ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेवर याप्रकारे हल्ला होणे चिंताजनक असून, गुन्हेगार लवकरात लवकर अटक व्हावी, यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, घटनास्थळासमोरील रहस्यमय हालचालींनी थरारक रहस्य अधिक समोर येणार आहे. या प्रकरणातून घरातील सुरक्षा, एकट्याच राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई याबाबत प्रशासनास सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.