मुंबईत भर दिवसा गोळीबार; गोवंडीत १९ वर्षीय तरुणीची हत्या
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई मंगळवारी दुपारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे हादरली. गोवंडीतील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत भर दिवसा झालेल्या गोळीबारात १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून आरोपी महिला फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरात तरुणीवर गोळी झाडण्यात आली. गोळी लागल्यानंतर ती तरुणी काही अंतर चालत गेली; मात्र गंभीर जखमी अवस्थेत तिचा मृत्यू झाला. यामुळे नेमके घटनास्थळ ओळखण्यात पोलिसांना सुरुवातीला अडचण आली.
प्राथमिक तपासात ही घटना वैयक्तिक वादातून घडल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीचे एका विवाहित पुरुषाशी जवळचे संबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता. याच कारणावरून दोन दिवसांपूर्वी दोघींमध्ये तीव्र वाद झाला होता. त्या रागातून संबंधित महिलेने तरुणीवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपी महिला फरार आहे. तिचा शोध सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आरोपी महिलेकडे पिस्तूल कुठून आले, हे शस्त्र कोणाच्या माध्यमातून मिळवले गेले, याचा सखोल तपास सुरू आहे. मुंबईसारख्या महानगरात भर दिवसा अशा प्रकारची गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.