वसई हादरली! पाण्याच्या टाकीतील मानवी हाडांमागील गूढ काय; हत्या की अघोरी कृत्य?
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – वसईमध्ये खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. नवपाडा परिसरातील एका ३० वर्षीय जुन्या इमारतीतील बंद पाण्याच्या टाकीत मानवी कवटी आणि काही हाडे आढळली आहेत. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आहे. टाकी तोडण्याचे काम सुरू असताना मजुरांना हे मानवी शरीराचे अवशेष सापडले. घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. मानवी शरीराचे अवशेष अपूर्ण असल्याने ही हत्या आहे की अंधश्रद्धा? अथवा भानामतीचा प्रकार? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. फॉरेन्सिक तपासानंतरच अवशेषांची ओळख आणि प्रकरणाचा उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी सांगितलं की, “ही ३० वर्षांपूर्वी बांधलेली इमारत आहे, ३० वर्षांपासून पाण्याची टाकी बंदच होती. मजूर टाकी तोडत होते. वरचा स्लॅब तोडल्यानंतर सापळा आणि कवटी आढळली. माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो. पुढील तपास सुरू आहे”.
मागील ३० वर्षांपासून ही टाकी वापरात नव्हती. पण सध्या या टाकीच्या दुरुस्तीसाठी इमारतीवर पत्रे टाकण्याचं काम सुरू होतं. टाकीचे तोडकाम सुरू असताना मजुरांना मानवी शरीराची कवटी आणि काही हाड सापडली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. तत्काळ माणिकपूर पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपास सुरू केला आहे.
शरीराचे पूर्ण अवयव घटनास्थळी आढळले नसल्याने नेमका काय प्रकार आहे, याबाबत तपास केला जात आहे. अंधश्रद्धेचा प्रकार आहे का? की हत्या आहे? याबाबत स्पष्ट माहिती समोर येऊ शकलेली नाही. दोन वर्षांपूर्वी या इमारतीमध्ये गॅस लिक होऊन गुदमरून दोन ते तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. जवळपास आठ ते दहा लोक चाळीमध्ये राहतात. दरम्यान मानवी शरीराची हाडे कोणाची आहेत, याबाबतची माहिती फॉरेन्सिक तपासानंतरच समोर येईल. सर्व बाजूने चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सांगितलंय.