निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील चार राऊंट फायरिंग; पोलिसांकडून १२ पथकं तैनात

Spread the love

निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील चार राऊंट फायरिंग; पोलिसांकडून १२ पथकं तैनात

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू परिसरातील घराबाहेर रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली असून रोहित शेट्टीच्या इमारतीभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इमारतीबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला असून विभागीय पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक तपास करत असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. गोळीबाराच्या घटनेच्या वेळी रोहित शेट्टी त्याच्या घरी होता की नाही, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी १२ पथकं तैनात केली आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांचा संशय हा बिश्नोई गँगवर असून आतापर्यंत तसे धागेदोरे त्यांना मिळाले नाहीत. या घटनेनंतर पोलिसांनी रोहित शेट्टी आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चौकशी केली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी पाच काडतुसांचे रिकामे तुकडे जप्त केले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी रोहित शेट्टीच्या इमारतीवर पाच राऊंड गोळीबार केला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर जुहू पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमसुद्धा त्याठिकाणी पोहोचली आहे. रोहित शेट्टीच्या जुहू इथळ्या घराबाहेरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पोलिसांनी परिसराला घेराव घातल्याचं दिसून येत आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

याआधी अभिनेता सलमान खानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर अशाच पद्धतीने अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्या प्रकरणात बिश्नोई गँगचे गुंड सामील होते. त्यामुळे आता रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील गोळीबारप्रकरणीही बिश्नोई गँगचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होईल, असं म्हटलं जात आहे. याप्रकरणी अद्याप रोहित शेट्टी किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. रोहित शेट्टी हा बॉलिवूड इंडस्ट्रीतीली प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आहे.गोलमाल’ फ्रँचाइजीमधील चित्रपट, ‘सिंघम’ फ्रँचाइजीमधील चित्रपट, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘बोल बच्चन’, ‘ऑल द बेस्ट’, ‘सूर्यवंशी’ यांसारखे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon