ऐन निवडणुकीच्या तोंडावर राहुल नार्वेकरांच्या अडचणीत वाढ; कुलाबा मतदारसंघातील वाद थेट हायकोर्टात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघातील प्रभागांमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून सुरू झालेला वाद आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. राहुल नार्वेकरांच्या कृती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप केल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना राजकारणात खळबळ माजली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. राहुल नार्वेकरांनी पदाचा गैरवापर करत इच्छुक उमेदवारांना अर्जच भरू न दिल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. प्रभाग २२४,२२५,२२६ आणि २२७ मधील वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. कारण २२५,२२६ आणि २२७ मधील प्रभागात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक रिंगणात आहेत .कुलाबा येथील इच्छुक उमेदवार बबन महाडीक यांच्यासह इतरांनी याचिका दाखल केली आहे.
इच्छुक उमेदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहेय याचिकाकर्त्यांना नियमित सुनावणीकरता वाट पाहण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. वेळेच कारण पुढे करत तब्बल २२ जणांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेवटच्या दिवशी स्वीकारले नव्हते . अर्ज न स्वीकारलेल्या उमेदवारांना निवडणुकीला उभ राहण्याची अनुमती देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. जनता दल आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणास्तव नाकारण्यात आले होते.
इच्छुक उमेदवारांच्या तक्रारीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कृतीबाबत पालिकेने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात प्रतिकूल मत नोंदवलं होतं. याप्रकरणाची सखोल चौकशी करत, सीसीटिव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवून तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी सर्वांची नाव चिन्हासहित मतपत्रिकेवर समाविष्ट करण्याचे आदेश देण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे.