मुंबईसह देशातील पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर देशभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंडिगो एअरलाइन्सला बुधवारी दुपारी ३.३० वाजता ईमेलद्वारे देशातील पाच आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
या मेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या विमानतळांचा उल्लेख असून, घटनेनंतर सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी तात्काळ चौकशी सुरू केली असून, मेल कुणाकडून पाठवण्यात आला याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानालाही अशाच प्रकारची धमकी मिळाल्याने लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, “धमकी मिळताच सरकारी सुरक्षा समितीला कळवून सर्व आवश्यक उपाययोजना राबवण्यात आल्या.”
सध्या देशातील सर्व प्रमुख विमानतळांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. सीआयएसएफ, स्थानिक पोलीस, श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथक सतर्क ठेवण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत.