विरार-सफाळे रोरो बोटीच्या तत्परतेमुळे तिघांचा जीव वाचला
पालघर / नवीन पाटील
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा जीव रोरो बोटीच्या तत्परतेमुळे थोडक्यात वाचला. विरार पश्चिमेतील नारंगी जेट्टीवर शनिवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली.
एका इसमाचा पाय घसरून तो खाडीत पडला. त्याला वाचवण्यासाठी अन्य दोघांनीही खाडीत उडी घेतली. मात्र ओहोटीमुळे तिघेही खाडीपत्रातून समुद्राच्या प्रवाहात वाहत जाऊ लागले.
याची माहिती मिळताच महाराष्ट्र सागरी मंडळाचे बंदर निरीक्षक नवनीत निजाई यांनी रोरो बोटीवरील कर्मचारी आदेश नाईक यांना तातडीने संपर्क साधला. त्यानंतर रोरो बोट घटनास्थळी धावून गेली आणि काही वेळातच बुडणाऱ्या तिन्ही इसमांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
रोरो बोटीच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.