गोवंडीमध्ये १९ वर्षीय मुलाने आपल्या १६ वर्षीय मित्राची शीतपेयामधून विष देऊन केली हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईमधील गोवंडी परिसरात एका १६ वर्षीय मुलाचा शीतपेय प्यायल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली, तर त्याच्यासोबत शीतपेय प्यायलेल्या मित्रालाही त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र पोलीस तपासामध्ये मित्रानेच हा कट रचून मित्राला संपवल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी १९ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गोवंडीमध्ये १९ वर्षीय मुलाने आपल्या १६ वर्षीय मित्राचा शीतपेयामधून विष देऊन जीव घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मित्र आपल्याकडे दुर्लक्ष करुन दुसऱ्या मित्रांना भाव देतो या रागातून हे कृत्य केल्याचं उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. २९ जून रोजी गोवंडी येथे आरोपी जीशान शेख याच्या घरी त्याचा मित्र शाहीन हा मृतावस्थेत आढळून आला. तर स्वतः जीशानलाही उलट्या तसेच मळमळत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. २८ जूनच्या रात्री दोन्ही मित्राने एनर्जी ड्रिंक घेतल्याने दोघेही आजारी पडल्याचा दावा या मुलाने केला. सुरुवातीला याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.
मात्र शवविच्छेदन अहवालात विषारी पदार्थ मृत्यूचे कारण असल्याचे दिसून आल्याने याप्रकरणी पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपणच मित्राची हत्या केल्याचे जीशानने कबुल केले. मित्र नीट बोलत नाही, आपल्याला टाळत असल्याच्या रागातून त्याच्या शीतपेयामध्ये किटकनाशक मिसळल्याची धक्कादायक कबुली या मुलाने दिली आहे. गेल्या महिन्यात ईदच्या वेळी उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी गेला असता त्याने ही योजना आखल्याचे उघड केले. याप्रकरणी १९ वर्षीय जीशानला अटक करण्यात आली आहे.