आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाकडून हल्ला; महिला पोलिसाचं केस ओढत मंगळसूत्र तोडलं, दोन महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
जळगाव – आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या महिन्यात प्रेम विवाह प्रकरणावरून विवाहित तरुणाची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील काही संशयित आरोपींना पोलीस पकडण्यासाठी गेले असता महिला पोलिसांवर हल्ला करण्यात आला. ही घटना जळगाव शहरातील हुडको परिसरामध्ये घडली आहे. पिंप्राळा हुडको परिसरात बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली.रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पथकावर जमावाने हल्ला चढवला. ज्यात दोन महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. एका महिला पोलिसाच्या गळ्यातील मंगळसूत्रही या झटापटीत तुटून हरवले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्यातील संशयितांना पकडण्यासाठी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पथक पिंप्राळा हुडको परिसरात गेले होते. गेल्या महिन्यात प्रेमविवाहानंतर झालेल्या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर काही संशयित अजून फरार आहेत. याच संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक गेले होते. पोलिसांचे पथक पिंप्राळा हुडकोत पोहचताच जमावाने त्यांना घेरले. आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली. जमावाचा आक्रमक पवित्रा पहाता महिला पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव अधिकच हिंसक झाला. जमावाने महिला पोलिसांचे केस ओढून त्यांना खाली पाडले. आणि मारहाण केली. झटापटीत स्वाती पाटील नावाच्या महिला पोलिसांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून हरवले. तर शिला गांगुर्डे या महिला पोलिसांचा जमावातील एका व्यक्तीने कडाडून चावा घेतला. ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोन्ही जखमी महिला पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरा पर्यंत रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.