बस चालक मोरे तुरुंगात, पण प्रकरणात नवी माहिती समोर, कोणाला वाचवण्याचा केला जातोय प्रयत्न?
संजय मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. त्यानं मोठी बस चालवलेली नव्हती
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – कुर्ला बेस्ट बस अपघातात ७ जणांनी जीव गमावला. या अपघातात ४८ जण जखमी झाले. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी बसचा चालक संजय मोरेला चोप दिला. संजय मोरे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. संजय मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. त्यानं मोठी बस चालवलेली नव्हती. पण अवघ्या तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर त्याच्या हाती मोठी इलेक्ट्रिक बस देण्यात आली. मोरे १ डिसेंबरपासून कंत्राटी चालक म्हणून बेस्टमध्ये रुजू झाला होता. अपुरं प्रशिक्षण देण्यात आल्यानं बसचा अपघात झाल्याचं चौकशीतून समोर आलेलं आहे.
बेस्ट प्रशासनानं ईव्हे ट्रान्स कंपनीला कंत्राट दिलेलं आहे. या कंपनीनं सोमवारीच मोरेला इलेक्ट्रिक बसच्या तीन फेऱ्या पूर्ण करण्यास सांगितलं होतं. मोरे दुपारी अडीचच्या सुमारास कामावर आला होता. रात्री तो ३३२ क्रमांकाची बस घेऊन निघाला. ही बस कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिमेहून आगरकर चौकाकडे जाण्यास निघाली होती. मोरेनं बस सुरु करताच पुढील काही मिनिटांतच अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या बसनं ३० ते ४० वाहनांना धडक दिली. पोलिसांनी अपघात प्रकरणी संजय मोरेला अटक केली आहे. तो २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असेल. पण धक्कादायब बाब म्हणजे पोलिसांनी ईव्हे ट्रान्स कंपनीविरोधात एफआयआर दाखल केलेला नाही. अननुभवी व्यक्तीच्या हाती बस देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा गुन्हा कंपनीकडून घडलेला आहे. पण तरीही कंपनीविरोधात अद्याप एफआयआरदेखील झालेला नाही. त्यामुळे पोलीस नेमकं कोणाला वाचवत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही आरटीओच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. अपघात झालेल्या बसमध्ये काही बिघाड होता का, याची माहिती आरटीओच्या अहवालातून मिळेल. मग या प्रकरणी पुढील कार्यवाही केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. कंत्राटी चालक पूर्णत: प्रशिक्षित आहेत का, याची खातरजमा करण्याची जबाबदारी बेस्ट प्रशासनाची असते. पण ही खातरजमा करण्यात बेस्ट प्रशासनाकडून झालेली नव्हती.