मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची सीआयएसएफ च्या कन्ट्रोल रुमला धमकी
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – गेल्या अनेक दिवपासांपासून देशात वारंवार एअरलाईन्सला धमक्यांचे फोन, मेसेज येत आहेत. कित्येक महिने उलटल्यानंतरही हे सत्र तसंच सुरू आहे. नुकताच मुंबई विमानतळालाही एक धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बुधवारी दुपारी बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. मुंबई विमानतळाला धमकीचा फोन आला. या धमकीच्या फोनमध्ये एका अज्ञात व्यक्तिकडून आलेल्या फोनवरुन विमानतळ उडवण्याचा कट असल्याची धमकी दिली गेली. हा कॉल सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF)च्या कंट्रोल रूमला हा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तिने आपलं नाव मोहम्मद असल्याचं सांगितलं होतं. मुंबईहून अझरबैजानला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये स्फोटके घेऊन जात असल्याचा दावा या व्यक्तिने केला होता.
मुंबई विमानतळावर सीआयएसएफच्या कंन्ट्रोल रुमला आलेल्या धमकीनंतर यंत्रणा आता अलर्ट झाल्या आहेत. धमकीच्या फोननंतर सीआयएसएफने तात्काळ पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं सतर्क होत विमानतळ परिसरातील सर्व सुरक्षा यंत्रणेला अलर्ट केलं. प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवत करडी नजर ठेवली आहे.
गेल्या अनेक दिवसांमध्ये एअरलाइन्सला आलेल्या धमक्यांच्या फोनमध्ये वाढ होत असल्यानं राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात सुरक्षेचा आढावा घेत सतर्कतेच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय घेतले आहे.ऑक्टोबरमध्ये देशभरात वेगवेगळ्या एअरलाईन्सला तब्बल ४५० हून अधिक धमक्यांचे कॉल आले. मात्र धमक्यांचे हे फोन खोटे होते. मात्र यामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चिंता व्यक्त केली जाते आहे. सुरक्षा यंत्रणांसमोर वाढत जाणाऱ्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी, राष्ट्रीय तपास संस्थेच्या सायबर शाखेने या धमकीच्या फोनची चौकशी सुरू केली आहे. धमक्यांच्या या फोन मागचा हेतू आणि त्यामागे नक्की कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या तपासातून केला जातोय.