गणेश नाईकांबद्दल अपशब्द काढल्यास नवी मुंबई पेटून उठेल – अनंत सुतार
नवी मुंबईत भाजप आणि शिंदे गटात वाक्युद्ध सुरू ; भाजप नेत्यांची शिंदे गटाला खुली धमकी
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – गणेश नाईक यांच्याविषयी बोलताना जपून बोलावे. त्यांच्याबद्दल अपशब्द काढल्यास नवी मुंबई पेटून उठेल, असा इशारा भाजपचे नेते अनंत सुतार यांनी दिला आहे. जे नगरसेवक म्हणूनही निवडून येऊ शकत नाहीत त्यांच्यावर काय बोलावे, अशी टीका शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांनी केली आहे. यामुळे नवी मुंबईत भाजप आणि शिंदे गटात वाक्युद्ध सुरू झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.
नवी मुंबईत सुरू असलेली हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. त्याविरोधात आंदोलन छेडले जाईल,असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांनी आमदार गणेश नाईक यांच्याबाबत बोलताना काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावर नाईक यांच्याबद्दल अपशब्द उच्चारल्यास नवी मुंबई पेटून उठेल, असा इशारा भाजपचे अनंत सुतार यांनी दिला तसेच विजय चौगुले हे विधानसभा, लोकसभा निवडणुकीत निवडून येत नाहीत, अशी थट्टाही केली होती. याला प्रत्युत्तर देताना सुतार हे नगरसेवक म्हणूनही निवडून येत नाहीत, असे वक्तव्य चौगुले यांनी केले. त्यामुळे हा वाद पाहता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद उफाळून आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर वरिष्ठ नेते कशाप्रकारे समेट घडवून आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.