नालासोपारा पूर्वेतील वालई पाडा परिसरात सेंट्रो कारचा ताबा सुटल्यानंतर थेट विहिरीत कोसळली; वेळीच मिळालेल्या मदतीमुळे दोघांचे जीव वाचले
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – नालासोपारा पूर्वेतील वालई पाडा येथे सोमवारी दुपारी एका कारचा भीषण अपघात झाला. संतोषी माता मंदिराजवळून जात असताना चालकाचा ताबा सुटला. सेंट्रो कारचा ताबा सुटल्यानंतर ती थेट विहिरीत जाऊन कोसळली. या अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ही विहिर प्रचंड खोल होती. त्यानंतर या कारमध्ये असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. या अपघाताचा थरार तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी अनुभवला. त्यांच्या सतर्कतेमुळेच अपघातानंतर लगेचच मदत मिळाली. शिवाय कारमध्ये असलेल्या लोकांचे जीव ही वाचले.
घटनेचे गांभीर्य ओळखून वसई-विरार महानगरपालिकेच्या आचोले अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशम दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. किशोर पाटील आणि त्यांच्या टीमने कोणतीही वेळ न घालवता लॅडरच्या साहाय्याने विहिरीत प्रवेश केला. तिथे मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. त्या स्थितीत अग्निशमन दलाने आपले बचाव कार्य सुरू केले. स्थानिकांची ही यावेळी मदत झाली. शेवटी कार पर्यंच अग्निशमन दलाचे जवान पोहोचले. त्यावेळी कारमध्ये दोन व्यक्ती असल्याचं त्यांना दिसून आले. त्यांना मदतीचा हात देण्यात आला.
त्यानंतर पाण्यात पडलेल्या कारमधून दोन्ही व्यक्तींना अत्यंत कौशल्याने बाहेर काढण्यात यश आले. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे दोन्ही जखमींना फारशी गंभीर इजा झाली नाही. अग्निशमन दलाच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारचा चक्काचूर झाला होता. पण त्यातील दोघांना जास्त मार लागला नाही. नशिबाने आणि वेळीच मिळालेल्या मदतीमुळे त्या दोघांचे ही जीव वाचले. अशा अपघातात सहजासहजी कुणी वाचत नाही. असे अपघात या आधी ही झाले आहेत. दरम्यान जखमींवर आता उपचार सुरू आहेत. अनियंत्रित वेग की तांत्रिक बिघाड, यामुळे हा अपघात झाला याचा अधिक तपास स्थानिक स्तरावर केला जात आहे.