कल्याण-मुरबाड आणि कल्याण-भिवंडी मार्गावर आरटीओ ची विशेष मोहीम;ओव्हर सिट भरणाऱ्या
१२ टॅक्सींवर केली कारवाई
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण नगर महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सीच्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. परंतु, त्यानंतरही टॅक्सीचालकांचा निष्काळजीपणा थांबत नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कठोर पावले उचलत १२ टॅक्सी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
कल्याण-मुरबाड आणि कल्याण-भिवंडी मार्गांवर विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होत असल्याचे आढळून आले. संबंधित वाहनांवर दंड ठोठावण्यात आला आहे. टॅक्सीमध्ये बसवलेल्या अतिरिक्त सीट्स काढून टाकण्यात आल्या आहेत. आरटीओ अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
कल्याण नगर महामार्गावर रायता पुलावर ओव्हरटेक करताना इको टॅक्सी चालकाने समोर येणाऱ्या मिक्सर वाहनालाा जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला होता. टॅक्सीची क्षमता ६ प्रवाशांची होती. तरीही टॅक्सीत ११ प्रवाशी भरले होते. हा अपघात झाल्यावर सुद्धा काळी पिली टॅक्सी चालकांनी निष्काळजीपण कायम ठेवला आहे. चालक अजूनही टॅक्सीत ओव्हर सिट प्रवाशी भरत आहेत.