इराणला पाठींबा न देणं केंद्राची मोठी चूक,भारत मोठ्या संकटात सापडणार – राज ठाकरे
मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवतीर्थावर राज ठाकरे यांचे जोरदार भाषण; इराण-इस्रायल युद्धावर मोदी सरकारला घेरलं
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवतीर्थावर जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्याचा विकास, नोकरी, वाहतूक कोंडी यावर सरकारला घेरलं. तसेच त्यांनी इराण-इस्रायल युद्धावर भाष्य करताना मोदी सरकारलाही घेरलं. मोदी सरकारने इराणला पाठिंबा न देण्याची मोठी चुक केली आहे. या चुकीचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, असा मोठं भाकितही त्यांनी व्यक्त केलं. आज शहरांची अवस्था बकाल झाली आहे. शहरांना आकार राहिलेला नाही. कोणीही येतं कुठेही इमारती बांधतं. कोणालाही कसल्याही इमारती बांधण्याच्या परवानग्या दिल्या जातायत, अशी टाकीहा राज ठाकरेंनी केली.
मनसेच्या स्थापनेला गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी २० वर्षे झाली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “सध्या सगळीकडे धाकधूक आहे. भीषण परिस्थिती आहे. अन्न शिजवायला गॅस मिळत नाहीये. खरं तर काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राहून गेल्या. इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता. त्या इराणवरती जे हल्ले होत आहेत, त्यामध्ये आपण इराणला साथ द्यायला हवी होती. या देशामध्ये येणारं बरचसं तेल इराणहून येतं. ते आपल्याला तेल रुपयात देतात. खामेनेई गेल्यानंतरही आपल्या पंतप्रधानांनी कुठलेही निषेधाचे एकही निवेदन काढले नाही. हल्ल्यावरही कुठले निवेदन दिले नाही,” असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले.
तसेच, हा देश जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर नेहमी आपल्या पाठीशी उभा राहिला, त्या देशाच्या पाठीमागे आपण राहिलो नाहीत. याचा आपल्याला भविष्यात निश्चितच त्रास होणार. आपण नेमके कुठे जात आहोत, हेच समजायला वाव नाही, असा हल्लाबोलही राज ठाकरेंनी केला. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण काढली. ज्या वयात राजकारणात आलो, तेव्हा बाळासाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं होतं की तू भाषण कसं करतोस हे महत्त्वाचं नाही. तू आज भाषणात लोकांना काय दिलं, हे महत्त्वाचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.