वांद्रे रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; अवध एक्सप्रेसमधून होणाऱ्या चरस तस्करीचा पर्दाफाश करत १३ कोटींचा गांजा जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला नशेखोरीचा विळखा बसला आहे. या विळख्यातून मुंबईला मुक्त करण्यासाठी आता मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. सध्या मुंबईतील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रेल्वे पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्रमक पाऊले उचलल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला वांद्रे रेल्वे टर्मिनसवर पोलिसांनी कोट्यवधींचे चरस जप्त केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला बोरिवलीत भाजप नगरसेवकाने स्वतः मैदानात उतरून नशेचा अड्डा उध्वस्त केला आहे. या दोन्ही कारवाईंमुळे मुंबईतील ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. सध्या नशामुक्त मुंबईसाठी पोलीस आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्त आघाडी उघडल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबईत वांद्रे रेल्वे पोलिसांनी गोरखपूर-मुंबई अवध एक्सप्रेसमधून होणाऱ्या एका मोठ्या चरस तस्करीचा पर्दाफाश केला आहे. दुपारी ४.१५ वाजता ही गाडी वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक ४ वर आली होती. असे असताना एका सतर्क सफाई कर्मचाऱ्याला जनरल डब्यात एक बेवारस संशयास्पद बॅग आढळली होती. ही माहिती मिळताच रेल्वे पोलीस, आरपीएफ, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या बॅगेची तपासणी केली असता त्यात चरसचे ३१ पॅकेट्स सापडले. या चरसचे एकूण वजन १३ किलो ८३४ ग्रॅम इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १३ कोटी ८३ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. मोठा पोलीस बंदोबस्त पाहून आरोपी बॅग सोडून पसार झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान २०२६ या वर्षांत इतक्या मोठ्या चरसचा साठा पकडण्याची रेल्वे पोलिसांची ही पहिलीच कारवाई आहेत.