नगरपरिषद निवडणुकीचं मतदान संपताच ईव्हीएम मशीनचं सील तोडलं; १७ प्रभागातील ईव्हीएम मशीन सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व मशीन उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये ऑन ऑफ आणि सीलकरून स्ट्राँगरूममध्ये नेण्यासाठी तहसील कार्यालय येथे नेण्यात आल्या. परंतु तहसील कार्यालयामध्ये सदर मशीन १७ प्रभागातील ईव्हीएम मशीन सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केलाय. त्यामुळे गोंदियात एकच गोंधळ उडाला. कोणतीही पूर्व सूचना उमेदवाराला आणि कोणत्याही प्रतिनिधीला देण्यात आली नाही. अशा प्रकारे ईव्हीएम मशीनचे सील तोडून त्यांच्या छेडखानी तर करण्यात आली नाही ना? असा संशय आता उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सालेकसा नगरपंचायतीमध्ये सध्या एकच गोंधळ निर्माण झालाय. त्यामुळे सालेकसा तहसील कार्यालय परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांनी सांगितलं की स्वीच ऑन ऑफ आहे की नाही. हे आम्ही कंट्रोल युनिट पाहिलं आणि याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. अशी त्यांनी प्रतिक्रिया संबंधित व्यक्तींना दिलीय.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक तीन मधील बुधनंबर ३ येथे असलेल्या मालवी शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. यामुळं काहीकाळ मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक मतदार दुपारपासून मतदान केंद्रावर पोहचले असतानाही, त्यांना सायंकाळपर्यंत मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी मतदान केंद्राजवळ जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा केंद्रावर तैनात करण्यात आला. मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप केले जात आहे.
परळी नगर परिषदेच्या इमारतीमध्ये नगरपरिषदांच्या मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्याकरता स्ट्रॉंग रूम करण्यात आली आहे. या ठिकाणी एसआरपीएफ आणि पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. असे असतानाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांनी प्रतिनिधी म्हणून भेट दिली. न्यायालयाच्या भूमिकेनंतर निकालासाठी १७ दिवस लागणार असल्याने मतपेट्यांसोबत छेडछाड होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी आम्हाला इथे राहण्याची परवानगी देण्याची अजब मागणी केल्याचं पाहायला मिळाले.