कल्पेश तारमाळे कडून नाशिकच्या शेतकऱ्याची १.४४ कोटींची फसवणूक, कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – पनवेल येथील मस्तानी देशी दारू दुकानाचे लायसन्स आपल्या नावावर करून देण्याचे आमिष दाखवून कल्याणमधील एका इसमाने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याची तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, ठाणे पोलीस तपास करत आहेत. हा प्रकार २४ जुलै २०२४ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधीत कल्याण रेल्वे स्थानक पश्चिम परिसरात घडला.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खडक मळगावचे रहिवासी निलेश वारुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कल्याणमधील कल्पेश तारमळे याने फसवणुकीचा डाव रचला. तारमळे याने वारुळे व त्यांच्या भावाला पनवेल येथील मस्तानी देशी दारू दुकान, ज्याचे लायसन्स सध्या मूळ मालक मुकुंद म्हात्रे यांच्या नावावर आहे, ते त्यांच्या नावावर हस्तांतरित करून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला भुलून वारुळे व त्यांच्या भावाने वेळोवेळी एकूण १.४४ कोटी रुपये तारमळेला दिले.
यापैकी ६१ लाख रुपये मूळ मालकाला दिल्याचा दावा तारमळे याने केला, मात्र उर्वरित रक्कम परत केली नाही किंवा लायसन्स हस्तांतरित करण्याची कोणतीही प्रक्रिया केली नाही. पैसे परत मिळवण्यासाठी वारुळे यांनी वारंवार पाठपुरावा केला असता, तारमळे याने ९ एप्रिल २०२५ रोजी सारस्वत बँकेचा ४ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, त्या धनादेशाच्या खात्यात शिल्लक नसल्यामुळे तो बाऊन्स झाला. त्यानंतर १ मे २०२५ रोजी चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील स्वतःच्या खात्याचा ५३ लाख रुपयांचा चेक दिला. पण हा चेकदेखील बँकेत पुरेशी शिल्लक नसल्याने परत आला.
शेतकऱ्याने दिलेली मोठी रक्कम परत केली नाही, तसेच लायसन्स हस्तांतरित न करता बनावट आश्वासने देऊन वेळ काढत फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी कल्पेश तारमळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
ही घटना पुन्हा एकदा दाखवते की, मोठ्या व्यवहारात योग्य पडताळणी न करता कुठल्याही आमिषाला भुलणे किती धोकादायक ठरू शकते.