मुंबई जलमय ! पहिल्याच पावसात मेट्रोमध्ये पाणी शिरल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्यांची अरेरावी, प्रवाशांचा संताप
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसाने शहरातील विविध ठिकाणी पाणी साचलेलं असताना सोमवारी थेट भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या वरळी- आरे भुयारी मेट्रो मार्गावरील वाहतूक सोमवारी पावसामुळे विस्कळीत झाली. वरळी स्थानक ते आचार्य अत्रे चौक स्थानक (वरळी नाका) सेवा ठप्प झाली असून तांत्रिक कारणामुळे मेट्रो सेवेवर परिणाम झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात मोठ्या प्रमाणात शिरले. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पात पाणी शिरल्याने कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भुयारी मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास सोईस्कर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात ही अपेक्षा फोल ठरली आहे. वरळी मेट्रो स्थानकात पाणी साठून चिखल झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्याचवेळी या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींसोबत अरेरावी केल्याचं पहायला मिळालं.
एक्वा लाइन म्हणून ओळखली जाणारी ही भुयारी मेट्रो एकूण ३३ किमी लांबीची आहे. यातील धारावी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) हा ९.६९ किमी चा टप्पा काही दिवसांपूर्वीच सुरू झाला होता. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या मेट्रो मार्गाची उभारणी करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये मदत करत आहेत. आरे जेव्हीएलआर ते बीकेसी असा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर २०२४ ला सुरू झाला होता. हा १२.९९ किमी लांबीचा आहे. यात १० स्थानके आहेतमान्सून तळकोकणात पोहोचल्यानंतर आता तो मध्य अरबी समुद्रासह मुंबईत पोहोचण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यानुसार मोसमी पाऊस पुढील तीन दिवसांत मुंबईत दाखल होईल. त्यादरम्यान मान्सून संपूर्ण कर्नाटकसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज आहे. पुढील आठवड्यात कोकणात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर व उपनगरात पुढील दोन दिवस आकाश पूर्ण वेळ ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.