अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातच्या भुज मधून अटक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – रविवारी पहाटे सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर दोघेही आरोपी वसई हायवे अर्थात मुंबई अहमदाबाद हायवेच्या दिशेने पळाले होते. एका रिक्षावाल्याला त्यांनी वसई हायवेचा पत्ता विचारला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपींचा माग काढत होते. तसेच सायबर टीमकडून डंप डेटाही काढण्यात आला. दोन्ही आरोपी भुज येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याची पुष्टी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर भुजच्या स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती देण्यात आली. कारण स्थानिक पोलिसांना न कळवताच मुंबई पोलिस आरोपींना पकडण्यासाठी गेले असते तर ते आरोपी व्यावसायिक गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर गोळीबार होऊ शकतो, अशी शंका होती. त्यामुळेच पोलिसांनी खबरदारी घेत गुजरातमधील स्थानिक पोलीसांचे पथक सोबत घेतले. तर गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक पथक भुजला पोहोचले. त्यानंतर विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक करून मुसक्या आवळल्या.
विकी गुप्ता (वय २१, रा. चंपारण्य, बिहार), सागर पाल (वय २४, रा. नरकटियागंज, चंपारण्य, बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट मधील घराच्या दिशेने पाच ते सहा राउंड फायर केले. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा, सायबर पोलीस, फॉरेन्सिक टीम सलमानच्या घराजवळ दाखल झाल्या.
दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला गोळीबार करणारे दोघेजण गुजरात मधील भुज येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना मंगळवारी मुंबईमध्ये आणले जाणार आहे. या प्रकरणात बिश्नोई गॅंगच्या सहभागाबाबतही त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. दोन्ही आरोपी मागील काही दिवसांपासून पनवेल मध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. पनवेल मध्येच सलमान खानचे फार्म हाऊस देखील आहे. त्यामुळे त्यांची नेमकी योजना काय होती याबाबतही पोलीस चौकशी करणार आहेत.