१ मेपासून ‘मराठी अनिवार्य’!
परवाने रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षा-टॅक्सी संघटनेचा एल्गार; मुंबईत बोलावली जाहीर सभा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – व्यवहारिक मराठी’ सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांना अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत ऑटो-टॅक्सी संघटनेनं राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. २ मे २०२६ पासून मराठी लिहिता-वाचता न येणाऱ्या ऑटो-टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि गैरकायदेशीर असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरवण्यासाठी ऑटो-टॅक्सी चालकांची महत्त्वाची सभा बोलावण्यात आली आहे. ही सभा सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये होणार असून मोठ्या संख्येने चालक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संघटनेचे पदाधिकारी शशांक राव यांनी सर्व चालकांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ‘व्यवहारिक मराठी’ सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांना अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव व संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.
ही बैठक आज दिनांक २७ एप्रिल रोजी परिवहन मंत्री यांच्या दालनात (४०१ विस्तारित इमारत, मंत्रालय) दुपारी १२.३० वाजता होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने अमराठी चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, या मुद्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे यावर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात प्रवाशांशी सुसंवाद वाढवण्यासाठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांना किमान ‘ व्यवहारिक मराठी’ भाषा येणे अनिवार्य करण्याची भूमिका प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे. ही भूमिका केवळ भाषिक आग्रह नसून, प्रशासन, सेवा गुणवत्ता आणि सामाजिक समन्वय यांचा व्यापक विचार करून घेतलेला निर्णय म्हणून पाहता येतो. अशी भूमिका शासनाच्या वतीने घेण्यात आली आहे.
मराठी ही राज्याची अधिकृत राजभाषा आहे. दररोज लाखो प्रवासी रिक्षा, टॅक्सी, बस, ॲप-आधारित सेवा (ओला-उबर) यांचा वापर करतात. अशा वेळी चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद सहज, स्पष्ट आणि प्रभावी असणे अत्यंत आवश्यक ठरते.अनेकदा अमराठी चालकांमुळे संवादात अडथळे निर्माण होतात, तक्रारी वाढतात आणि गैरसमज होतात.