महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान; निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. तर १२ मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.
विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ५, शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडी १ जागा येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मतं असल्यामुळे महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
विधान परिषदेतील ज्या ९ आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे त्याच्यात उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा),नीलम गोऱ्हे (शिवसेना),
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट),अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट),गोपीचंद पडळकर (भाजप),रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप),राजेश राठोड (काँग्रेस),प्रवीण दटके (भाजप) आणि रमेश कराड (भाजप)
यांचा समावेश आहे.
दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (१३१ आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (५७ आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (४० आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना १० मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.