मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी १० एकर जागा द्या

Spread the love

मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी १० एकर जागा द्या

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुलुंडमधील दहा एकर जागेवर जागतिक दर्जाचे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घ्या, अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. मुलुंड डंपिंग ग्राउंड जागेबद्दल कुठलाही निर्णय घेतला गेल्या नसल्याचं राज्य सरकारने काल विधान परिषदेत स्पष्टीकरण दिल्यानंतर तातडीने नार्वेकर यांनी हे पत्र दिलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांवेळीही ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात मुंबईत कर्करोग रुग्णालया उभारणीचे आश्वासन देण्यात आले होते.

मुलुंड डम्पिंग ग्राउंड वर गोल्फ कोर्स उभारण्याचा अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून लेखी उत्तराद्वारे देण्यात आलंय. मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून जमीन पुनर्प्राप्त करण्यात येत असून ४० एकर भूखंड आहे. त्यापैकी दहा एकर भूखंड हा कॅन्सर हॉस्पिटल साठी द्यावा, असं नार्वेकर यांनी पत्रात म्हटलं आहे रिलायन्स फाउंडेशन, टाटा ट्रस्ट किंवा गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप या संस्थांच्या सहकार्याने हे रुग्णालय सुरु केल्यास मुंबई आणि एमएमआरमध्ये मोठी रुग्णसेवा ठरेल. याशिवाय इतर कॅन्सर रुग्णालयावरील ताण देखील कमी होईल, असे नार्वेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मुलूंड येथील बायो-माइन्ड करण्यात आलेल्या सुमारे ४० एकर भूखंडाच्या भविष्यातील वापराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून सध्या व्यवहार्यता अभ्यास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्या जागेच्या काही भागावर जागतिक दर्जाचे कर्करोग उपचार केंद्र (कॅन्सर हॉस्पिटल) उभारण्याचा गंभीरपणे विचार करावा, अशी विनंती नार्वेकरांनी देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी कर्करोग उपचारासाठी उपलब्ध सुविधा मोठ्या ताणाखाली आहेत. विशेषतः टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी होत असल्याने नवीन अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे, या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश आणि महाराष्ट्रातील कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळेल आणि राज्यातील आरोग्यसेवा व्यवस्थेला मोठे बळ मिळेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon