एकतर्फी प्रेमात प्रियकराने केली मैत्रिणीची गळा आवळून हत्या; बेपत्ता तरूणीचा ५८ व्या दिवशी सापडला मृतदेह, प्रियकर अखेर पोलीसांच्या ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
सावंतवाडी – दीड वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध… तिच्यावर अपार प्रेम… पण तिच्याकडून प्रतिसाद नाही. मैत्रीत जवळीक, मात्र प्रेमाला ठाम नकार. त्यातून मनात वाढत गेलेला राग शेवटी टोकाला पोहोचला. “ती माझी होणार नसेल तर कुणाचीच होऊ देणार नाही,” असा विकृत विचार करून एकतर्फी प्रेमात अडकलेल्या प्रियकराने मैत्रिणीचा गळा आवळून तिचा खून केला. ही घटना आहे, कुडाळ तालुक्यातील घावनळे वायंगणवाडी येथील दीक्षा तिमाजी बागवे (१७) ही २ ऑगस्ट २०२५ पासून बेपत्ता झाली होती. अखेर वाडोस येथील निर्जन असलेल्या बांटमाचा चाळा परिसरात डॉ. शरद पाटील यांच्या शेत मांगरात तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी संशयित म्हणून तिचा प्रियकर कुणाल कृष्णा कुंभार (२२) याला अटक केली असून, त्याने पोलिसांना खुनाची कबुली दिल्याची माहिती सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा सावंतवाडी येथील महाविद्यालयामध्ये शिकत होती. २ ऑगस्ट रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली; मात्र नेहमीप्रमाणे दुपारी ती घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा थांगपत्ता न लागल्याने ३ ऑगस्ट रोजी तिच्या आईने आपली मुलगी दीक्षा बागवे ही बेपत्ता असल्याची तक्रार कुडाळ पोलिस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. संशयित कुणाल कुंभारवर पोलिस लक्ष ठेवून होते. त्याने आधी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र कसून केलेल्या चौकशीत अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
संशयित कुणाल कुंभार हा सावंतवाडी येथे आयटीआयमध्ये शिकत होता. गेल्या दीड वर्षापूर्वी दीक्षा व त्याची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र दीक्षा त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती, त्यामुळे तो संतापला होता. याच रागातून त्याने ती माझी नाही झाली तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही असा विचार करून तिला निर्घृणपणे संपवलं.
कुडाळ पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवरील शेवटचा कॉल ज्या व्यक्तीकडून आला होता त्याच्यावर संशय घेतला गेला. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी संशयित कुणाल कुंभार याला तीन ते चार वेळा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. मात्र प्रत्येक वेळी तो वेगवेगळ्या माहिती देत होता, त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी गडद झाला. अखेर कठोर चौकशीत त्याने संपूर्ण घटनाक्रम उघड करत मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. तपासात हा खून एकतर्फी प्रेमातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.