एमपीएससी क्लासच्या नावाखाली कल्याणमध्ये सुरु होती फसवणूक; मनसेकडून क्लासचालकाला चोप
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमध्ये जीएसटी इन्स्पेक्टर असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षांचे क्लास चालवण्याचा बोगस आणि धक्कादायक प्रकार सुरु होता. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने हे प्रकरण उघडकीस आणले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोगस जीएसटी इन्स्पेक्टरला चांगलाच चोप दिला. विद्यार्थांची अवाजवी फी घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोलीसांनी क्लासचालकाला ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ सिंग चंडेल असं या क्लासचालकाचं नाव आहे. कल्याण रेल्वे स्टेशन समोर ‘सिद्धार्थ लॉजिक’ या नावाने यूपीएससी एमपीएससी बँकिंग रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांचे क्लास त्यानं सुरु केले होते. आतापर्यंत आपण ७०० विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत लावले असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले. मात्र या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न शिकवता विद्यार्थ्यांकडून वारेमाप फी आकारून योग्य शिकवणी न देता विद्यार्थ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार चांडेल करत होता.
विद्यार्थ्यांनी या सर्व प्रकरणाची तक्रार मनविसेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांना केली. त्यानंतर चौधरी इतर पदाधिकाऱ्यांनी या क्लासमध्ये जाऊन त्याच्याकडे त्याच्या जीएसटी इन्स्पेक्टर पदाबाबत विचारणा केली. सरकारी अधिकारी असूनही तुम्ही क्लास कसे घेऊ शकता? या प्रश्नाचे माधानकारक उत्तर न दिल्याने यावेळी संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ सिंग चांडेलला चोप दिला. सिद्धार्थ सिंग चंडेल याने विद्यार्थ्यांकडून सर्व विषयांची वेगवेगळ्या प्रकारे फी घेत असल्याचे समोर आले आहे. कुणाकडून १५ हजार कोणाकडून २० हजार तर कोणाकडून ५० हजार अशी वेगवेगळी फी जशी मिळेल तशी वसूल केली. एवढी फी घेऊन देखील शिक्षण समाधानकार मिळत नव्हतं, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या क्लासमध्ये वेळोवेळी शिक्षक बदलत होते. हे शिक्षक केवळ स्पर्धा परीक्षांची प्राथमिक माहिती या विद्यार्थ्यांना देत होते. वारंवार बदली होणारे शिक्षक यामुळे योग्य शिक्षण मिळत नसल्याने याची तक्रार विद्यार्थ्यांनी सिद्धार्थ याच्याकडे केली असता, मी जे शिक्षक देईल तेच तुम्हाला शिकवतील असे उडवाउडवीची उत्तरे त्यांना मिळाली होती. तसेच काही विद्यार्थ्यांनी भरलेली फी परत मागितली असता विद्यार्थ्यांना धमकावत तुम्हाला काय करायचे आहे ते करा फी परत मिळणार नाही अशी दमदाटी केल्याची माहिती आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील संतप्त होऊन आमचे पैसेही गेले आणि विद्यार्थ्यांचं वर्ष ही वाया गेलं आता आमचं काय असा सवाल उपस्थित केला असून विद्यार्थ्यांनी अशा फसव्या क्लास पासून सावध राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.