गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाच्या यंदा ५००० जादा बसेस; परिवहन मंत्री सरनाईकांची मोठी घोषणा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण एसटी महामंडळ यंदा गणेशोत्सवासाठी ५००० जादा बसेस सोडणार आहे. २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात या बसेस धावणार आहेत. २२ जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होणार आहे असून महिला व ज्येष्ठांना तिकीट दरात सवलत मिळणार आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली. गणपती उत्सव कोकणातील लोकांचा महत्त्वाचा सण मानला जातो. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या -तोट्याचा विचार न करता एसटी महामंडळ दरवर्षी जादा बसेस सोडते. यंदाही सुमारे ५००० जादा गाड्या कोकणात जाणार आहेत,” असे मंत्री सरनाईक म्हणाले.
या बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच, बसस्थानकावर किंवा MSRTC Bus Reservation ॲपवरही आरक्षण करता येणार आहे. आषाढी एकादशीला एसटी महामंडळाने ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के आणि महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून २३ ऑगस्टपासून या जादा बसेस सुटणार आहेत. मागील वर्षी ४३०० बसेस सोडल्या होत्या. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाबद्दल कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांकडून समाधान व्यक्त केलं जात असून या गणेशभक्तांना आतापासून गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत.