रविवारी सुट्टी असल्याने पवना धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यु; पुण्यातील ३ कुटुंबांवर मोठा आघात
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – सध्या राज्यभरात मोठा उकाडा आहे. यातून सुटका मिळविण्यासाठी लोक पर्यटनस्थळी धाव घेतात. अनेकदा तरुण मंडळी नदीत पोहायला जातात. मात्र यामुळेच तिघांचा घात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदी पात्रातून एक धक्कादायक घटना घडली आहे.
मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदी पात्रात ही घटना घडली. प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख अशी मृतांची नावं आहेत. रविवार सुट्टी असल्याने हे तिघेही पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. सध्या वाढत असलेल्या उकाड्यामुळे त्यांना नदीच्या पात्रात पोहण्याचा मोह झाला.
मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ शिवदुर्ग मित्र मंडळ यांनी तातडीने मदतकार्य राबवून मृतदेह बाहेर काढले. पर्यटनासाठी आलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिघांच्या कुटुंबाकडून मोठा आक्रोश व्यक्त केला जात आहे. घरातून तरुण मुलांच्या निधनामुळे त्यांच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नदी-नाल्यात पोहताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.