वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अखेर पोलिसांना यश; ७ दिवसांपासून फरार असलेला सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला शुक्रवारी पहाटे बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पिंपरी – चिंचवड – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला देखील अटक झाली. वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांना आधीच अटक झाली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंच्या अटकेनंतर शुक्रवारी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत वैष्णवी मृत्यू प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुसाले झाले आहेत. हगवणे यांच्याकडून मोठ्या सुनेचा देखील छळ होत होता. दरम्यान राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. दिल्लीच्या महिला आयोगाने देखील याची दखल घेतली आहे. दरम्यान या प्रकरणाची बावधान पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. पोलिसांनी अवघ्या एक ते दीड मिनीटांमध्ये प्रकरणाची माहिती दिली. बावधन पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना आधी अटक करण्यात आली होती. दोघे जण फरार होते. त्यांना शोधण्यासाठी सहा पथकं तैनात करण्यात आली होती. वैष्णवीचा सासरा आणि दिर या दोघांना शुक्रवारी पुणे स्वारगेट येथून अटक करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांंनी दिली आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे आम्ही गोळा केले आहेत, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लवकरच प्रकरणाच्या मुळाशी पोहचू असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (२३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार होते. त्या दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.