चांदी देण्याच्या अमिषाने महिलांची फसवणूक; आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
इचलकरंजी – राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बाजारभावापेक्षा कमी दराने बिलासहीत सोने-चांदी देण्याचे आमिष दाखवत तीन महिलांची ६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या सुभाष संकपाळ, साक्षी सुभाष संकपाळ व विकी आगवाणी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. यापैकी विद्या संकपाळ व विकी आगवाणी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रेश्मा चाँदसाहेब जमादार यांनी फिर्याद दिली आहे.
विद्या व साक्षी संकपाळ आणि विकी आगवाणी यांनी संगनमत करत फसवणूकीच्या उद्देशाने बाजारभावापेक्षा कमी दरात सोने-चांदी बिलासहित देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी रेश्मा जमादार यांच्याकडून २ लाख रुपये, त्यांच्या मैत्रिणी शितल विठोबा वाघमारे यांच्याकडून ३० हजार रुपये व सलीमाबी जावेद नदाफ यांच्याकडून ३ लाख ८५ हजार रुपये असे ६ लाख १५ हजार रुपये घेतले. १६ नोव्हेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत तिघांनी या रकमा घेतल्या. त्यानंतर वारंवार मागणी करुनही सोने-चांदी अथवा पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक केल्याप्रकरणी रेश्मा जमादार यांनी शिवाजीनगर पोलिसांत तिघांविरुध्द फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विद्या संकपाळ व विकी आगवाणी यांना अटक केली आहे.