नवीन वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा बँकेद्वारे होणार; सरकार ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – नवीन सरकारच्या नववर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार असल्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. वैयक्तिक खाते उघडण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कोणत्या बँकेत जमा करावेत, यावरून सतत चर्चा होत असतात. राजकीय पक्षांमध्येही अनेकदा यावरून चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. मात्र फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते मुंबई बँकेत जमा होतील असा निर्णय घेतला आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर असल्याने सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जाण्याची शक्यता आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम – २२० मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय खलील प्रमाणे आहेत
१) राज्य सरकार ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार
२) राज्यातील तब्बल ९६३ शेतकऱ्यांना होणार फायदा ३) सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार.
४) आकारी पड जमिनीसंदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय.