राज्यातील शाळांचे व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय, विरोधकांकडून संताप
पोलीस महानगर नेटवर्क
चंद्रपूर – राज्यातील उद्योग, गुजरातमध्ये पळविल्याचा आरोप सतत केला जात असून त्यातच आता महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन आता गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळेचे व्यवस्थापन अदानी फाउंडेशन, अहमदाबाद या संस्थेकडे हस्तांतरित केले जाईल. या निर्णयामुळे शालेय व्यवस्थापनात मोठा बदल होणार असून, पुढील १५ दिवसांत शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन अदानी फाउंडेशनकडे जाईल.
शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा, घुग्घुस, जि. चंद्रपूरचे व्यवस्थापन अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित केले जाणार आहे. या शाळेचे व्यवस्थापन बदलण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही महत्त्वाच्या अटी शर्ती घालून मान्यता दिली आहे. या अटींमध्ये शाळेची किमान पटसंख्या कायम ठेवणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण दायित्व अदानी फाउंडेशनवर राहील, तसेच शाळा इंग्रजी माध्यमातच राहील याची खात्री करणे आवश्यक आहे. शासनाच्या निर्णयानुसार, शाळेचे व्यवस्थापन बदलल्यानंतर अदानी फाउंडेशनला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल. शासनाने दिलेल्या अटी शर्तींचे पालन न केल्यास, व्यवस्थापन हस्तांतरण रद्द करण्याचा अधिकार शासनाकडे राहील. याशिवाय, नवीन व्यवस्थापनाच्या तक्रारी किंवा अटींचा भंग झाल्यास, शाळेचे व्यवस्थापन पुन्हा सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येईल. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, नागपूर विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी १५ दिवसांत व्यवस्थापन बदलाबाबतची कार्यवाही पूर्ण करावी आणि त्याची माहिती शासनाला कळवावी. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
बॉक्स यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. अंबादास दानवे यांनी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे पत्रक आपल्या अधिकृत एक्स (द्विटर) अकाऊंटवरून शेअर केले आहे. या पत्रकामध्ये चंद्रपूर येथील कार्मेल एज्युकेशन सोसायटीची इंग्रजी माध्यमाची शाळा या अदानी फाऊंडेशनला चालवायला दिल्याचे म्हटले आहे. याचाच उल्लेख करत अंबादास दानवे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात दिला असून महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे उत्तम उदाहरण असल्याचा टोला दानवे यांनी लगावला.